किल्ले रोहिडेश्वर

भौगोलिक स्थान



सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
इतिहास


या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवाजीने किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजीच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगडतोरणातुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता.

गडावर जाण्याच्या वाटा



या गडावर जाण्यासाठी दोन बाजूंनी मार्ग आहेत: एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्गे. चिखलावडे कडून जाताना दोन मार्ग आहेत हे दोन्ही मार्ग थोडे अवघड आहेत. ट्रेक साठी या मार्गाचा उपयोग करता येईल.
बाजारवाडी मार्गे
दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो. गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करतात. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास पुरतात.
चिखलावडे मार्गे

चिखलावडे खुर्द येथून टप्याचे नाकाड मार्गे किवा चिखलावडे बुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्गे या गडावर जाता येते. हा मार्ग थोडा कठीण आहे. चिखलावडे येथे जाण्यासाठी पुढील मार्ग आहे. भोर -चौपाटी (महाड रोड)-वेनवडी-शिरवली-आंबेघर-चिखलावडे फाटा-चिखलावडे.
                 गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायया पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर आहे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपतीभैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिडाचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्रेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज आणि पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे.

किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा तसेच चुन्याचा गिलावाही केला जायचा. हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एकसंध करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे हे चुन्याचे घाणे बहुतेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.


              रोहिडेश्वर किल्ला हिरवळीच्या शालुने नटला 

नेरे- भोर तालुक्याच्या दक्षिणेस बारा किलोमीटर अंतरावर असणारा दुर्गम डोंगरी रोहिडेश्वर किल्ला परिसर पर्यटकांना भुरळ घालीत आहे़. रोहिडेश्वर किल्ल्यावरून पर्यटकांना भाटघर धरण नीरा देवघर धरण रायरेश्वर किल्ला यांच्याजवळून निसर्गरम्य व हिरवाईचा शालू पांघरलेल्याचे सौंदर्य पाहावयास मिळत आहे. यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे़.
भोरचा दक्षिण भाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा प्रदेश असल्याने पावसाळा चालू होताच या परिसरात लहान-मोठे धबधबे सुरू होतात़ या धबधब्यात ओलेचिंब होऊन पर्यटक आनंद लुटत आहेत़ बाजारवाडी गावाला ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी रोहिडेश्वर किल्ल्यास विचित्रगड नाव होते व ते तालुक्याचे ठिकाण होते़ या ठिकाणी बाजारपेठ होती व भव्य बाजार भरत असल्यामुळे या गावाला बाजारवाडी नाव पडले आहे़ गडावर शिवदुर्ग संवर्धन संस्था व बाजारवाडी ग्रामस्थांच्या माधमातून विकासकामे चालू आहेत़ गडावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायी मार्गाने जावे लागते़ विशेषत: या गडावर पर्यटक गिर्यारोहणासाठी-ट्रेकिंग आवर्जून येत आहेत़.
गडावर रोहिडमल्ल देवस्थान असून अंधारतळे पातळनगरीतळे अशी २३ तळी आहेत. भोर-मांढरदेवी रस्तालगतच रोहिडेश्वर किल्ला असल्याने पर्यटक किल्ल्यावरून पर्यटन करून जवळीलच मांढरदेवी-काळूबाई गडाकडे रवाना होत असतात़.या वेळी वाटेवरच सात किलोमीटरचा आंबाडखिंड वळणा-वळणांचा घाट असून या घाटात खळखळणारे धबधबे पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी मोहित करतात.

रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव असून या ठिकाणी पर्यटकांच्या गाड्यांसाठी पार्किंग व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे़ हिरव्यागार वेलींनी फुललेल्या डोंगररांगांवरून गडावर मनमोहक दृश्य पाहण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी राज्यातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे़.